मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत असल्याचे विधानसभेत सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली होती. तर आता भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. योग्य वेळी त्यांची नावे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर करतील, असा दावा राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्ष भाजपचे नेते सहा महिन्यांत सरकार पडले. वर्षभरात सरकार पडेल, असे मुहूर्त काढत होते. परंतु आता एक वर्ष पूर्ण झाल्याने सरकार स्थिरस्थावर झाले आहे. अजित पवार यांनीही विधानसभेत भाजपच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना जोरदार उत्तर दिले होते. तसेच सरकार मजबूत असल्याचा संकेत दिला होते.

दरम्यान, भाजपमधील ७०  टक्के आमदार राष्ट्रवादीचेच आहेत. त्याच्यातील बरेच आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निर्णय घेतील, असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. यावर आता भाजप नेत्यांकडून कोणती प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.