नाशिक (प्रतिनिधी) : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या शिफारशी प्रलंबित ठेवल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत राज्यपालांवर घणाघात केला. राज्यपाल हे घटनात्मक पदावर काम करत आहेत. राज्यपालांनी घटनात्मक पदाचा मान राखत घटनेची मूल्ये पाळायला हवीत. असे जर घडत नसेल तर राज्यपाल हे घटनेचा खून करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. नाशिकमध्ये वसंत गीते आणि संजय बागुल यांच्या शिवसेनाप्रवेश प्रसंगी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रात आमचे सरकार आहे. त्यामुळे ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा आधार घेऊन कुणीही सुडाचे राजकारण खेळू नये. या अशा नोटीसही येत राहतात. त्यावर इतकी चर्चा करण्याची गरज नाही. राज्यपालांनी सरकारने केलेल्या शिफारशी प्रलंबित ठेवून सरकारचा नव्हे तर महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेचा अपमान केला आहे. १० महिने होत आले असताना अजूनही या जागा रिक्त ठेवण्याचे स्पष्टीकरण राज्यपालांनी द्यायला हवे. राजकीय लढाया लढण्यास आम्ही समर्थ आहोत. तुम्ही मात्र घटनेचा भंग करू नये.