हुबळी (वृत्तसंस्था) : कर्नाटकमधील अंकोला तालुक्यात हिल्लूर-होसकांबी गावाजवळ केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला झालेल्या अपघातात त्यांच्या पत्नी विजया नाईक आणि स्वीयसहायकाचा मृत्यू झाला. त्यांच्या गाडीचा दुसऱ्या कोणत्याही वाहनाला धडकून नाही, तर चालकाने निवडलेला चुकीचा रस्ता आणि नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

नाईक आणि त्यांच्या कुटुंबातील चार जणांनी येळ्ळापूर येथे सकाळी गंटे गणपतीचे दर्शन घेतले आणि पूजा केली. त्यानंतर हे सर्वजण गोकर्णकडे रवाना झाले. राष्ट्रीय महामार्ग-६३ वरून त्यांच्या गाडीने लहान रस्त्यावर वळण घेतले. मात्र तो रस्ता अतिशय खराब होता, त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी पलटली. मात्र, त्यांनी मुख्य हायवेने न जाता शार्टकट घेतला आणि तिथेच घात झाला.

मुख्य रस्त्याने लागणारा वेळ वाचविण्यासाठी उपरस्ता निवडला. हा रस्ता अतिशय  खराब असा होता. यामुळेच एखादा खड्डा चुकविण्याच्या नादात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडा-झुडपांवर जाऊन आदळली.