औरंगाबाद (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. या निर्णयाविरोधात छिंदमने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय कायम ठेवला आहे. यामुळे छिंदमला मोठा दणका बसला आहे.

अहमदनगर महापालिका आणि राज्य सरकारने तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द केले होते. या निर्णयाविरोधात छिंदमने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु न्यायालयाने हाच निर्णय कायम ठेवत छिंदम यांची याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडून आला होता. तसेच त्याला उपमहापौर पदही देण्यात आले होते. दरम्यान, महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरुन बोलताना त्यांने छत्रपती शिवाजी महाराजांबद्द अवमानकारक विधान केले होते. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या याप्रकारावर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. छिंदमला राज्यातून हद्दपार करण्याची मागणी होऊ लागली होती.