मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू रॉय यांनी पक्षश्रेष्ठींकडे शिवसेनेविरोधात तक्रार केली असून काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे.
शिवसेना नेत्यांचे घोटाळ्यांमध्ये नाव येत आहे. त्यामुळे त्याचा धोका काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. सरकारमध्ये कोणत्याही क्षणी नवा घोटाळा बाहेर येऊ शकतो, अशी भीती रॉय यांनी पत्रात व्यक्त केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप रॉय यांनी याआधी केला होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबतची आघाडी पुढे काँग्रेसला धोक्याची ठरु शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. महाविकासाआघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेसला सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.