कल्याण (प्रतिनिधी) :  शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक  यांची  ईडीने चौकशी केली होती. आता याबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सरनाईक  यांनी टिटवाळा गुरुवली येथील १०० कोटीची ७८ एकर जमीन ईडीने जप्त केली असल्याची माहिती सोमय्या  यांनी दिली आहे. तसेच घोटाळा केलेली १००  कोटीची रक्कम परत न केल्यास सरनाईक यांच्या अन्य मालमत्ताही जप्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. टिटवाळा गुरुवली येथील जमिनीच्या ठिकाणी सोमय्या यांनी आज  (रविवार) भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  

ते म्हणाले की, एनईसीएलच्या १००  कोटीच्या घोटाळ्याच्या रक्कमेतून सरनाईक यांनी टिटवाळा गुरुवली येथे ७८  एकर जमीन विकत घेतली होती. ही जमीन जप्त करण्याची नोटीस ईडीने २०१४ मध्ये काढली होती. १३ हजार गुतंवणुकदारांचे ५६०  कोटी रुपये सरनाईक यांनी हडप केले आहेत. सरनाईक यांचा तिसरा घोटाळा मी बाहेर काढला आहे. औरंगजेबाचा जयजयकार करणाऱ्या ठाकरे सरकारने विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतली आहे. विरोधी पक्ष ठाकरे सरकारच्या अशा प्रकारच्या कोणत्याही दबावाला भीक घालत नाही. आमच्या सुरक्षेपेक्षा जनतेची सुरक्षा महत्वाची असल्याचे  सोमय्या यांनी यावेळी सांगितले.