कोल्हापूर (प्रतिनिधी) : रंकाळा स्टॅण्ड परिसरातील बालाजी ऍक्वा व शुध्द पेयजल केंद्राला व्यवसाय परवाना विभागाने आज (बुधवार) सील केले. अन्न व औषध प्रशासनाचे प्राप्त प्रमाणपत्र, ना हरकत पत्र नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

कॅनव्दारे पाणी पुन्हा भरणे, साठा करणे, हाताळणी करणे, विक्री करणे इत्यादी प्रक्रिया करणाऱ्या संस्था, केंद्राकडे परवाना असणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत. त्यानुसार शहरातील ७ संस्थांना नोटीस दिल्या होत्या. त्यापैकी २ संस्थांनी मुदतीत व्यवसाय बंद न केल्यामुळे रंकाळा स्टॅण्ड परिसरातील बालाजी ऍक्वा आणि शुध्द पेयजल यांचा व्यवसाय सीलबंद करण्यात आला.

ही कारवाई अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व परवाना अधीक्षक रामचंद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय अतिग्रे, मंदार कुलकर्णी, रविंद्र पोवार, विजय वाघेला,  निलेश कदम, लियाकत बारस्कर, शकील पठाण, राजाराम निगवेकर यांनी केली.