मुंबई (प्रतिनिधी) : सिल्वासा, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूमुळे खळबळ माजली आहे. त्यांचा मृतदेह मुंबईतील एका हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला. या प्रकरणावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही प्रश्न  उपस्थित केले  आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि कंगना रणौत अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या घटनांचा उल्लेख करत राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे.  

राऊत यांनी रोखठोक सदरातून डेलकर यांच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित करून म्हटले आहे की, खासदार मोहनभाई डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांनी देशभरात खळबळ माजवली. त्या प्रत्येकासाठी डेलकरांची आत्महत्या आव्हान आहे. डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही. सुशांत राजपूतने त्याच्या एका सिनेमात ‘आत्महत्या करू नये. निराश होऊ नये,’ असे संवाद फेकले. त्यामुळे सुशांतसारखा खंबीर मनाचा तरुण आत्महत्या कसा करील?  सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याची ‘पटकथा’ तयार झाली. त्या कथाकारांना डेलकरांच्या आत्महत्येमागे कोणतेच काळेबेरे दिसू नये? डेलकर यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली, स्वतःचा अत्यंत दारुण शेवट त्यांनी करून घेतला याबद्दल किती जण हळहळले?

मोहन डेलकर हे हिंमतबाज होते, ते पळपुटे नव्हते. ते आत्महत्या का करतील? त्यांना जय-पराजयाची चिंता कधीच वाटली नाही. अशा डेलकरांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलात फासावर लटकलेला आढळतो व सगळे चूप आहेत. एका नटाची आत्महत्या खळबळ माजवते, एका नटीचे बेकायदेशीर बांधकाम तोडल्यावर हलकल्लोळ होतो, पण सातवेळा निवडून आलेले एक खासदार मुंबईत संशयास्पदरीत्या मृत पावतात त्यावर कोणी काहीच आपटायला तयार नाही. डेलकर यांनी एक ‘सुसाईड नोट’ गुजरातीत लिहून ठेवली.  त्यात दादरा-नगर हवेलीचे प्रशासक डेलकरांचा छळ करीत होते, भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता, असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.