मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धव  ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची कार्य व निर्णय पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी खासदार अनिल देसाई,  खासदार धैर्यशील माने यांची विशेष उपस्थिती होती. विधान परिषद आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या संकल्पनेतून  ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

आजच्या डिजिटल युगात सर्व माहिती एका क्लीकवर उपलब्ध असली, तरी अनेक वेळा नागरिकांना आजही सरकारी निर्णयाची लिखितरुपी एकत्रित माहिती हवी असते, त्यामुळे ही पुस्तिका नक्कीच उपयुक्त ठरेल, असे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी  यावेळी व्यक्त केले.

कोरोना महामारीच्या लढाईत महाविकास आघाडीने घेतलेल्या लोकोपयोगी कामाची सविस्तर माहिती या पुस्तकात नमूद आहे. उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध करून देताना ५० हजार करोड रुपयांची गुंतवणूक आणण्याचे काम या एका वर्षात झाले आहे,  नवतंत्रज्ञान वापरून शिक्षण पध्दतीत यशस्वी प्रयोग,  ग्रामीण भागातील विकासासाठी अनेक चांगले निर्णय ठाकरे सरकारने घेतले आहेत. कोरोना काळात घेतलेल्या सर्व निर्णय प्रकिया तसेच जनतेसाठी उपलब्ध केलेल्या सोयीसुविधांची माहिती या पुस्तिकेत नमूद केली आहेत. ही पुस्तिका साकार करण्यासाठी मंत्रिमंडळातील सर्वांनी सहकार्य केल्याची भावना  शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली.