मुंबई (प्रतिनिधी) : आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या मराठा आणि ओबीसी समाजाला खूश करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आज (सोमवार) विधानसभेत २१ हजार ९९ कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या. त्यात ओबीसी समाजाच्या महाज्योती संस्थेसाठी ८१ कोटींची तर मराठा समाजाच्या सारथी संस्थेसाठी ११ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

राज्य सरकारने आज विधानसभेत सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये दोन्ही समाजासाठी भरीव तरतूद केली आहे. ओबीसींच्या महाज्योती संस्थेसाठी ८१ कोटींची तर मराठा समाजाच्या सारथी संस्थेसाठी ११ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ११ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भटक्या जमाती, विमुक्त जमातींच्या आश्रम शाळांसाठी २१६ कोटींचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही समाजाच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागणार असल्याचा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.