नवी दिल्ली (वृत्त्संस्था) : विवाहाचे वचन देऊन शरीरसंबंध ठेवणे म्हणजे बलात्कार होत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल  दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. लग्नाचे वचन देऊन बलात्कार करणाऱ्या व्यक्तीच्या सुटकेला आव्हान देणारी याचिका एका महिलेने दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालायने हा निष्कर्ष मांडत महिलेची याचिका फेटाळून लावली.

न्यायमूर्ती विभू बाखरु यांनी म्हटले की, लग्नाचे वचन देऊन शरीरसंबध ठेवण्याला बलात्कार म्हटले जाऊ शकत नाही. जर महिला दीर्घ काळापासून त्या व्यक्तीसोबत सतत शरीरसंबंध ठेवत असेल.  तर तेव्हा ते ऐच्छिक आणि लग्नाच्या हव्यासापोटी ठेवण्यात आल्याचे सिद्ध होते. जर पीडिता काही क्षणात शरीरसंबंध ठेवण्यास तयार झाली असेल तर लग्नाचे आमिष दाखवून ते ठेवल्याचे आपण म्हणू शकतो. तसेच काही प्रकरणांमध्ये महिलेची इच्छा नसतानाही लग्नाचे वचन महिलेला शरिरसंबंध ठेवण्यास प्रेरित करु शकते.