नवी दिल्ली  (प्रतिनिधी) : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत  ९ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये  प्रत्येकी २ हजारप्रमाणे १८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) दुपारी १२  वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही रक्कम पाठवली. त्याआधी मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली अर्पण केली.  यावेळी मोदी यांनी शेतकरी बांधवांशी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.  

दरम्यान, या योजनेसाठी लाभार्थी होण्यासाठी सरकारने काही अटी घालून दिल्या आहेत. शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या वडिलांचा किंवा आजोबांच्या नावे शेतजमीन असेल, तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही. काही शेतकरी शेती करतात, मात्र त्यांच्या नावे शेती योग्य जमीन नसेल, तर त्यांनाही या योजनेचा लाभ होणार नाही.  तर  प. बंगाल सरकारने ७० लाख शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन केलेले  नसल्याने या योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही.