पुणे (प्रतिनिधी) : राज्यात अनेक ठिकाणी आज (शुक्रवारी) सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून मुंबईसह नवी मुंबई, वसई, पालघर, रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.

पुण्याच्या ग्रामीण भागातही ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. वसई विरारमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असून अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. तर सकाळी नोकरी धंद्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.