मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना आणि राणे कुटुंबातील राजकीय वैर आहे. दोन्ही बाजूनी सातत्याने आरोप प्रत्यारोप झडतात. आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्याबद्दल खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा घातलेला आहे. त्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते, पण नारायण राणे भाजपला शरण गेले, असा धक्कादायक गौप्यस्फोट खासदार राऊत यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला.

कणकवली येथील एका कार्यक्रमात राऊत बोलत होते. नितेश राणेंनी नवी मुंबईत एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा घातला होता. या प्रकरणाची फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. ते नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते. पण नारायण राणे भाजपला शरण गेल्याने हे प्रकरण पाठीशी घालण्यात आले. जर आम्ही मनात आणले तर हे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आणू शकतो आणि असे झाल्यास दुसऱ्या महिन्यात राणे तुरूंगात जातील, असा इशारा राऊत यांनी राणे यांना दिला आहे.