उन्नाव (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसनेच घडवून आणली, असा खळबळजनक आरोप भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आज (रविवार) भर सभेत केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त उन्नाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

साक्षी महाराज म्हणाले की, अवेळीच सुभाषचंद्र बोस यांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आले होते. त्यांच्या लोकप्रियतेमुळे काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवली आहे. कारण, सुभाषचंद्र बोस यांच्या लोकप्रियतेसमोर पंडित नेहरू व महात्मा गांधी यांचा टिकाव लागत नव्हता. देशाच्या स्वातंत्र्य युद्धात सुभाषचंद्र बोस यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या मृत्यूबाबत अद्यापही गुढ का कायम आहे? पंडीत नेहरु यांनी चौकशी का केली नाही? त्यांच्या मृत्यूबाबतचे सत्य बाहेर यायला हवं, असेही साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.