रत्नागिरी (प्रतिनिधी) : सध्या राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी जर राज्यात भाजपचे सरकार असते तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपमध्ये असते, एवढेच नव्हे, मंत्रीपदावर असते, असा खळबळजनक दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला. ते आज (सोमवार) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर खरमरीत टीका केली होती. गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं. आघाडी सरकार पडणार असं सांगत भाजपा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. मात्र, आम्ही तर एक वर्षही पूर्ण केलं आहे. त्यामुळे राणेंच्या टीकेला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

या टीकेला नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आज महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली होती. ते राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यास इच्छुक होते. इस्लामपुरात जाऊन हे सर्व मी उघड करणार आहे.