मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे, अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून संवाद साधला. यावेळी त्यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबद्दल विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले. यावर फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.