पुणे (प्रतिनिधी) : मराठ्यांच्या वैध आरक्षणाचा महाविकासआघाडी सरकारनं खून केला आहे. मराठा समाजाने मागणी केली नसतानाही EWS देऊन सरकारने मराठ्यांची फसवणूक केली, असा घणाघाती आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केला. आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा लाभ देण्याचां निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयावर नाराज झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आज (शनिवार) पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

EWS आरक्षण द्या अशी मराठा समाजाची कधीही मागणी नव्हती. सरकारने गायकवाड आयोगाचा अपमान देखील केला गेला आहे. ते सांगतात की, उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही जर का EWS आरक्षण दिलेलं असेल, तर उच्च न्यायालयानेच गायकवाड आयोगाने दिलेले आरक्षण वैध ठरवलेलं आहे ना? मग येत्या २५ जानेवारीला जर याबद्दलची स्थगिती उठवण्याची वेळ जवळ आलेली आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी, मध्येच EWS आरक्षण देऊन, जे व्यापक स्वरूपात व अधिकृतरित्या महत्वाचं आरक्षण मिळणार आहे. त्याचा अवसानघात करण्याचं काम या महाविकासआघाडी सरकारने केलेलं आहे. २५ जानेवारी रोजी होणार्‍या सुनावणीत मराठा समाजाचा घात झाल्यास, या पुढील काळात निघणारे मोर्चे शांततेच्या मार्गाने निघणार नाहीत, एवढं सरकारने लक्षात ठेवावे, असा इशाराही समन्वयकांनी या वेळी दिला.

या पत्रकार परिषदेस राजेंद्र कुंजीर, शशिकला भोसेकर, राहुल पोकळे, विकास पासलकर, उत्तम कामठे, अनिल मारणे आदी उपस्थित होते.