मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पण ढगाळ वातावरणामुळे राज्यात थंडी जाणावली नाही. पण आता उत्तर भारतातून थंडीचा तडाखा महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यात कडाक्याची थंडी पाहायला मिळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढणार आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या कोरडं हवामान आहे. पुढचे पाच दिवस हवामान असचे राहणार असून तापमानात आणखी घट होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. या आठवड्यातही बऱ्यापैकी थंडी पाहायला मिळाली. पण आता पुढच्या आठवड्यात थंडीचा तडाखा वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आता उत्तरेकडून राज्यात थंड वाऱ्याचा प्रवाह वाहू लागला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत चांगलाच गारठा वाढल्याचे पाहायला मिळते आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊ लागली आहे. या कोरड्या वातावरणामुळे नववर्षाच्या सुरुवातीला राज्यात चांगलीच थंडी पाहायला मिळणार आहे.