मुंबई (प्रतिनिधी) : अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. त्यानंतर आता मंत्रिपद मिळवण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांचे लॉबिंग सुरू झाले आहे. वनमंत्रीपदासाठी आता शिवसेना आमदारांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देऊन विदर्भात राज्यमंत्री पद दिले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

दरम्यान, विदर्भातील गोपिकिशन बाजोरिया, नितीन देशमुख आणि संजय रायमुळकर या आमदारांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. या तिघांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष भाजपने जोरदार रान उठवले होते. सोमवारी राज्य विधीमंडळाचे अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर   राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. अखेर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकऱणात नांव आल्याने अडचणीत आलेले संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले आहे. तर वनमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.