मुंबई (प्रतिनिधी) : मी जेथे संधी मिळेल, तेथे ओबीसी समाजाचा आवाज उचलून धरणार आहे. पक्ष, जात विसरून फक्त आणि फक्त ओबीसी म्हणून उभा असल्याचे काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते. यावर भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

समाजात भांडण लावून महाराष्ट्र संकटात आणण्याचं काम कुणीही करू नये. राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही. कुठल्या समाजाला काय मिळेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारानुसारच मिळेल. कुठल्याही मंत्र्याने विचार करून बोललं पाहिजे, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या जाती असताना ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल, तर आम्ही पहारेकरी उभे आहोत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते. यावरच राणेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले   आहे.