टोप (प्रतिनिधी) :  घराच्या जागेवरून झालेल्या मारहाणीत शिरोली पुलाची येथील अशोक नवनाथ जानराव (वय ५७ ) यांचा उपचारादरम्यान आज (मंगळवार) मृत्यू झाला. याबाबत चुलत भाऊ, चुलती, भावजय यांच्यावर शिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद अमोल अशोक जानराव याने दिली आहे.

मयत अशोक जानराव आणि यातील आरोपी संतोष अभिमान जानराव, सुधाकर अभिमान जानराव, चुलती  पद्मीनी अभिमान जानराव, चुलत भावजय सुनिता सुधाकार जानराव हे सर्व (रा. माळवाडी, शिरोली पुलाची) हे एकमेकांच्या शेजारी राहत होते. यांच्यात घराच्या जागेवरून पूर्वीपासून वाद होत होता. शनिवारी (दि. १६) रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास या वादाचे पडसाद मारहाणीत झाले. या मारहाणीत वरील चौघांनी अमोल जानराव यांच्या भावाला आणि वडील अशोक जानराव यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या मारहाणीत अशोक जानराव यांना पोटात लाथाबुक्यांनी जबर मारहाण झाल्याने त्यांच्या पोटात गंभीर जखम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, औषधोपचार सुरु असताना कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात त्यांचा आज सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत म्हणून वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.