नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, ३ जवान शहीद झाले आहेत. तर ३ जवान जखमी झाले आहेत. याशिवाय ३ नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. गुरेज ते उरी सेक्टरदरम्यान हा गोळीबार केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले असून, पाकिस्तानचे ७ ते ८ जवान ठार केले असल्याचे वृत्त एएनआयने भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. याशिवाय भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराचे बंकर्स, लाँच पॅड्स उद्ध्वस्त करत मोठे नुकसान केले आहे.

पाकिस्तानकडून केरन, उरी, नौगाम सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. यावेळी नागरी वस्ती असलेल्या ठिकाणांना पाकिस्तानकडून टार्गेट करण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. यामध्ये भारताचे तीन जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत.

भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देत असून त्यांचे सात ते आठ सैनिक ठार केले आहेत. याशिवाय त्यांचे बंकर्स, लाँच पॅड्स उद्ध्वस्त करत मोठे नुकसान केले आहे. अनेक दहशतवादी तळांनाही यावेळी भारतीय लष्कराकडून टार्गेट करण्यात आले. दरम्यान स्थानिकांध्ये भीतीचे वातावरण असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

याआधी जम्मू काश्मीरमधील कुपवारामध्य्ये इंटरनेट सेवा ठप्प करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय लष्कराने केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) उपनिरीक्षक शहीद झाले आहेत. राकेश डोवल असे अधिकाऱ्याचे नाव आहे. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारादरम्यान ते शहीद झाले. याशिवाय एक जवान कॉन्स्टेबर वासू राजा जखमी आहे. त्याचा हात आणि तोंड जखमी आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.