मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे राज्यातील शैक्षणिक वर्षावर विपरीत परिणाम झालाय. असे असले तरी सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. यंदा राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मे नंतर घेण्याचे प्रयत्न असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.  

करोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या. त्यानंतर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. आता गायकवाड यांनी या परीक्षांच्या ढोबळ तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.