कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाने नुकतीच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने संस्कृतीनुरूप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्याचे अनुसरणीय आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते. आता राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुरूप कपडे परिधान करण्याची संहिता लागू करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. समितीने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवल्याची माहिती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

घनवट यांनी म्हटले आहे की, भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू केल्यामुळे मंदिरातील पावित्र्य आणि श्रद्धाभाव टिकून राहण्यास साहाय्य होईल. भारतीय वस्त्रे पाश्चात्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. तसेच भारतीय वस्त्र घातल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार-प्रचार होण्यासह तिच्याविषयी युवा पिढीमध्ये सार्थ स्वाभिमानही जागृत होईल. तसेच पारंपरिक वस्त्र निर्मिती करणार्‍या उद्योगाला चालना मिळेल. यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.