पेठवडगाव (प्रतिनिधी) : पेठवडगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून नगरपालिकेच्या चौकात लोकसभेत पास केलेल्या शेतीविषयी विधेयकांची होळी करण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध म्हणून घोषणा देण्यात आल्या.

आमदार राजू आवळे म्हणाले, ‘चहा विकणाऱ्या पंतप्रधानाने देश विकायला काढला असून दोन्ही शेतीविषयी विधेयकांमुळे पिकांची सरकारी खरेदी पूर्णपणे थांबेल. तसेच खासगी बाजार स्थापन होऊन शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव बंद होईल. सर्व धान्य, डाळी, तेलबिया, कांदा आणि बटाटा या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून काढल्या जातील. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे.’

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गिरीश फोंडे म्हणाले, ‘शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळत राहील, हे भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचे मत खोटे आहे. केवळ ६ टक्के शेतकरीच या हमीभावाचा लाभ घेतात. त्यामुळे हमीभाव देण्याची काही गरज नाही. एफसीआय आणि नाफेड खरेदी देखील थांबवावी. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत होणारा अन्नधान्याचा पुरवठाही थांबवावा, असे भाजप सरकारने नियुक्त केलेले शांता कुमार समितीनेच जाहीर केले आहे.’

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे म्हणाले, ‘मोदी सरकार हमीभाव व स्वामीनाथन आयोग बद्दल बोलत नाही. जगभरातील सर्व देशांमध्ये शेतकर्‍यांच्या उत्पादनाला हमीभाव हा नेहमीच कंपन्यांकडून नव्हे तर सरकारकडून दिला जातो. एकही देश याला अपवाद नाही. कंपन्यातर केवळ स्वस्त दरात शेतीमाल खरेदी करून चढ्या दराने विकण्याचे आणि नफा कमावण्याचे काम करत आहेत.’

काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवान जाधव यांनी या विधयकांवर टीका करत केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.

यावेळी बबनराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी पवार, स्वाती क्षिरसागर, संपतराव पवार, सचिन चव्हाण, कपिल पाटील, अन्सार देसाई, जमीर गडकरी, रघुनाथ पिसे, रणजीत पाटील, किरण पाटील, गौरव पाटील, शिवाजी आंबेकर, रमेश पाटोळे, नितीन सनगर, अभिजीत दबडे, विकास कांबळे, सत्यशील जाधव, शकील अत्तार, सुनील सलगर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.