पुणे (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीत मोठा खंड पडला होता. आता कोरोनाचा संसर्ग आवाक्यात आल्याने राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. २१ जून रोजी पालखी सोहळ्याला सुरुवात होत आहे. या सोहळ्यानिमित्त राज्य महिला आयोगाच्या वतीने वारकरी महिलांसाठी आरोग्यवारी उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. तरीही पालखी सोहळ्यादरम्यान महिलांसाठी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे वारीनंतर अनेक महिला आजारी पडतात. या आरोग्यवारी उपक्रमाचा शुभारंभ पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे रविवारी (१९ जून) दुपारी १२.२० वा. होणार आहे. राज्यसभा सदस्या वंदना चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, यंदा प्रथमच वारकरी महिलांना वारीदरम्यान आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. यात महिला वारकऱ्यांना विसावा कक्ष, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन यांची सुविधा पुरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे.

आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू/आळंदी/पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते हे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आरोग्यवारी संकल्पना मांडली. या ‘आरोग्यवारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारकरी महिलांना काही मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करून देण्यात यावे, स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परिसरात दर्शनी भागात लावावेत, अशा सूचना केल्या आहेत. पुणे, सातारा आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्याच्या प्रशासनाने आरोग्यवारी या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत महिला वारकऱ्यांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.