टोप (प्रतिनिधी) : माजी आमदार महादेवराव महाडिक  यांच्यावर टीका केली की चर्चेत येतो,  हे माहीत असल्यामुळे महाडिकांच्या नावाचा जप करण्याची सवय अनेकांना आहे. त्या सवयीप्रमाणेच बावड्यातील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी नांव न घेता  टीका केली.  पण शिरोलीकरांना पाणी पाजण्याचा आणि महाडिकांचे स्पष्ट नाव घेऊन टीका करण्याची  पालकमंत्र्यांची बिशाद नाही,  असे प्रत्युत्तर माजी आमदार अमल महाडिक यांनी  दिले.

बावड्यातील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना यापुढे ही शिरोलीकरांना पाणी पाजू, अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. या टीकेला अमल महाडिक यांनी  पत्रकाद्वारे उत्तर दिले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की,  तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी भरघोस निधी दिला. आज शहरातील ज्या पाइपलाइनच्या, ड्रेनेजच्या कामांची उद्घाटनं तुमचे नगरसेवक व तुम्ही करताय ती कामंसुद्धा माझ्या प्रयत्नांतून मंजूर झालेली आहेत. हे लक्षात असुद्या. स्वतःचं तुणतुणं वाजवत आता निवडणुका तोंडावर आहेत, म्हणून फक्त उद्घाटन करणाऱ्या पालकमंत्र्यांनी कुठलातरी संदर्भ कुठेतरी जोडून खूप मोठं कर्तृत्व गाजवल्याच्या अविर्भावात राहू नये. महाडिकांवर बोलण्यापेक्षा त्या टाकीच्या कामासाठी कधी मंजुरी मिळाली होती? निधी कुठून आला? काम पूर्ण करायला किती व का वेळ लागला? या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. आणि उत्तर देण्याचं धाडस नसेल तर इतकी वर्षं हे काम लटकवत ठेऊन, बावडेकरांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहिल्याबद्दल त्यांची जाहीर माफी मागावी.

ज्यांच्यामुळे तुमच्या राजकारणाची सुरुवात झाली. आज त्यांच्यावरच बोट उचलून तुम्ही अहंकार मिरवताय,  निवडणूक आली की विरोधात जाणाऱ्यांना संपवण्याची जाहीर भाषा करताय,  हे सगळं कोल्हापूरची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. तुमच्या या अहंकाराच उत्तर येत्या निवडणुकीत कोल्हापूरची जनताच तुम्हाला देईल. फक्त जनतेची ती उत्तरं खिलाडूवृत्तीने पचवण्याची शक्ती ठेवा, असेही महाडिक यांनी म्हटले आहे.