कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वी एसईबीसी मधून निवड झालेल्या महावितरणसह विविध विभागातील हजारो विद्यार्थ्यांना नोकरीत त्वरीत नियुक्ती मिळावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार संभाजीराजे छत्रपती आणि पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी महावितरणमध्ये निवड झालेल्या ३२७ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी झाली असून अद्याप त्यांची नियुक्ती झालेली नाही. त्या नियुक्त्या त्वरीत मिळाव्यात, महावितरण बरोबर विविध विभागातील रखडलेल्या नियुक्त्या त्वरीत करण्यात याव्यात, मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत एमपीएससीसह कोणत्याही परीक्षा घेण्यात येऊ नये, यासह मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या करण्यात आल्या.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि सकल मराठा समाजाचे सदस्य वसंतराव मुळीक, प्रजासत्ताक संघटनेचे दिलीप देसाई, शाहीर दिलीप सावंत, शिवसेनेचे हर्षल सुर्वे, इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत, गुलाबराव घोरपडे, अवधूत पाटील, मयुर पाटील, प्रताप नाईक, युवराज जाधव, अमित अडसुळे यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.