कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस वाहतूकदार मालकांची  आर्थिक फसवणूक करणाऱ्या ऊस मजूर मुकादम  यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आश्वासन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. 

यावेळी शैलेश बलकवडे म्हणाले की, ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक ही गंभीर  बाब आहे. फसवणूक झालेल्या  ऊस वाहतूकदारांनी टोळी मुकादमांशी केलेले करार, नोटऱ्या व ऑनलाईन बँकींगच्या माध्यमातून पाठविले पैसे आदीबाबत  तक्रारी द्याव्यात.  त्या तक्रारींच्या अनुषंगाने गुन्हे दाखल केले जातील.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. ऊसतोडीकरीता मराठवाडा व विदर्भातील ऊस मजूर मुकादम यांच्याकडून ऊस वाहतूकदार मालकांची दरवर्षी लाखो रुपयांची फसवणूक होत असते. याबाबत ऊस वाहतूकदार संघटनेमार्फत आ. प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले होते.

यावेळी सरंपच धनाजी खोत, सर्जेराव पाटील, ऊस वाहतूकदार संघटनेचे सदाशिव चव्हाण, विक्रम पाटील, वसंत प्रभावळे, अनिल हळदकर, कृष्णात राजिगरे, रघुनाथ सारंग, सुभाष पाटील, जयवंत मोरे, कृष्णात वैराट, तानाजी कदम, संजय घरपणकर, युवराज सुतार यांच्यासह राधानगरी-भुदरगड तालुक्यातील ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.