नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आलं असले, तरी शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारनं आंदोलनासाठी सुचवलेले पर्याय नाकारत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवलं असून, काहीजणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला.

केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याचं जाहीर करत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) हे कायदे पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेतले. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर कायदे लागूही करण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्राच्या या कायद्यांना देशातील काही भागातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. विशेषतः पंजाब, हरयाणात या कायद्याविरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे.

शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आलं असून, आज सरकारनं चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी दिल्लीतील निरंकारी समागम मैदानावर शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करावं, असा प्रस्ताव केंद्राकडून देण्यात आला. हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी नाकारला असून, दिल्लीतील रामलीला अथवा जंतरमंतर मैदानावरच आंदोलन करू, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. सिंधू सीमेवर बुरारीतील निरंकारी मैदानावर जाण्यास शेतकऱ्यांकडून नकार दिला जात आहे. याच ठिकाणी शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला.