नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) ‘मन की बात’ या कार्यक्रमातून नव्या कृषी कायद्यांवरुन आंदोलक शेतकऱ्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील काही शेतकऱ्यांची उदाहरण देत नव्या कृषी कायद्यांचे महत्व मोदींनी यावेळी पटवून दिले.

‘दिल्लीच्या सीमेवर मागील काही दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. तर विरोधकांनी केंद्राच्या या नव्या कायद्यांना काळे कायदे म्हणून संबोधले आहे. देशात शेती आणि त्याच्याशी निगडीत नव्या गोष्टी जोडल्या जात आहेत. कृषी क्षेत्रातील नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी नवे मार्ग खुले झाले आहेत. या अधिकारांच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या अडचणी देखील दूर होऊ लागल्या आहेत. देशाच्या संसदेने या कायद्यांवर खूप विचार करुन त्यांना मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांवरील अनेक बंधन या कायद्यामुळे नष्ट झाली आहेत आणि त्यांना नवे अधिकार मिळाले आहेत. यातून नव्या संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहेत, असे मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदींनी यावेळी महाराष्ट्रातील जितेंद्र भोइजी या शेतकऱ्याचा उल्लेख केला. जितेंद्र यांनी नव्या कायद्याचा फायदा उचलत आपली थकबाकी वसूल केल्याचे मोदींनी सांगितले. नव्या कायद्याअंतर्गत संबंधित क्षेत्रातील एसडीएमला केवळ एका महिन्यात शेतकऱ्याच्या तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अशा फायदेशीर कायद्याची ताकद हाती असल्यामुळे जितेंद्र यांची अडचण दूर झाली. त्यांनी तक्रारीची नोंद केली आणि अवघ्या काही दिवसांत त्यांना थकबाकी मिळाली, असे मोदी म्हणाले.