मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. आता या प्रकरणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत  धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या प्रकऱणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी व कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, याची आपण नोंद घ्यावी, अशी मागणी खापरे यांनी पत्रामध्ये  केली आहे.

तर धनजंय मुंडे यांनी स्वत: त्यांना दोन पत्नी आहेत, असे मान्य केले आहे. त्यात आता तिसरी महिला त्यांच्यावर आरोप करत आहे. त्यामुळे जोपर्यंत धनंजय मुंडे या प्रकरणातून मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत सहमतीने संबंध असल्याचे स्पष्ट करून बलात्काराचे आरोप फेटाळून लावले आहेत.