पुणे (प्रतिनिधी) : मंत्रिमंडळ बैठकीत झालेली वादावादी जनहितासाठी की स्वहितासाठी होती, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे, अशी मागणी करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथील प्रसिद्ध लक्ष्मी-नृसिंह मंदिरात आज (गुरुवार) सायंकाळी पूजा करून दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

मंदिराच्या सभामंडपात भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीस यांचा इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने सत्कार केला. तसेच त्यांना मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत जी वादावादी झाली ती जनहितासाठी होती की स्वहितासाठी होती, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. यासंदर्भातही अनेक चर्चा समोर येत आहेत. आमची मागणी आहे की याचा फायदा ग्राहकांना झाला पाहिजे. मात्र हे सरकार जनतेचे नाव समोर करून बिल्डरांचा फायदा करायला निघाले आहे. विजेची भरमसाठ बिले कमी करत नाहीत मात्र दारुचे परवाने फी सरकार कमी करत आहे हे आश्चर्यकारक असल्याचेही ते म्हणाले.

या वेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, इंदापूरचे शहराध्यक्ष शकील सय्यद आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.