कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याच्या कारणावरून कोल्हापूर महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली. यावर खा. संभाजीराजे छत्रपती यांनी, मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या कारणावरून सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो. परंतु मला मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. त्यामुळे मी तुमच्यावर नाराज असल्याचे परिपत्रकाद्वारे खा. संभाजीराजे छत्रपतींनी म्हटले आहे.

परिपत्रकात म्हटले आहे की, मी गेली 14 वर्षे मी मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात सक्रिय आहे. आजपर्यंत एकदाही या विषयात मी राजकारण आणले नाही. मराठा आरक्षण हे माझ्यासाठी राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोल्हापूरातील हजारो कोटी रुपयांचा गॅस पाईपलाईनचा प्रकल्प महापालिकेच्या परवानग्या वाचून रखडलेला आहे. त्या परवानग्या तुम्ही दिल्या असत्या, तर कोल्हापूरच्या विकासात फार मोठी भर पडली असती. हा प्रकल्प मंजूर करून आणण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. या योजनेमुळे सर्व कोल्हापूरकरांचे भविष्य बदलून जाणार आहे. आजच्या तहकूब झालेल्या सभेत या प्रकल्पाला परवानग्या देणं आवश्यक होतं.

तसेच, कोल्हापूरच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या टर्फ करीता 5.50 कोटी रुपये केंद्राकडून मी मंजूर करून आणलेत. तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान (टर्फ) बनणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजले. त्या संदर्भातील परवानगी या महासभेत दिली असती तर मला आनंद झाला असता. कोल्हापूरातून आंतरराष्ट्रीय स्तराचे हॉकी खेळाडू तयार झाले पाहिजेत हे माझं स्वप्न आहे.

कोरोनाचा कोल्हापुरात सर्वाधिक प्रकोप वाढला आहे. त्यासाठी अधिक नियोजन करण्याची गरज आहे, त्यासंदर्भातील उपाय योजना या महासभेत केल्या असत्या तर त्या अधिक योग्य झाले असते. पण तुम्ही सर्वांनी ही महासभा माझ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या भेटीच्या संदर्भाला चुकीच्या पद्धतीने घेतले. आजपर्यंत मी जेंव्हा मोदीजींना वैयक्तिक भेटण्यासाठी गेलो तेंव्हा आमची भेट झालीच आहे.

पण यावेळी माझी पंतप्रधानांकडे अशी मागणी होती की, महाराष्ट्रातील सर्व खासदारांना सोबत घेऊन भेट घ्यावी. पण कोव्हिडमुळे एवढ्या सर्वांना एकत्र येणं धोक्याचं ठरण्याची शक्यता असावी. त्यामुळे त्यांना तशी वेळ देणं सध्या शक्य होत नसेल. मला एकट्याला जाऊन भेटणं आणि श्रेय घेणं शक्य झालं असतं. मी ठरवलं तर कधीही भेटू शकतो. पण मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेयवाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. तो सर्वांना सोबत घेऊन लढायचा आहे. तुमच्या माझ्याविषयीच्या भावनेचा मी आदर करतो. आपण सर्वजण मिळून कोल्हापूर च्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत राहू. मराठा आरक्षणाला यश नक्कीच मिळणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.