मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार राज्यातील सर्व निवडणुका एकत्रित लढविणार असल्याचा दावा केला जात असतो. मात्र मुंबई काँग्रेसचे नूतन अध्यक्ष भाई जगताप यांनी मात्र पुन्हा एकदा वेगळी भूमिका मांडली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा माझा विचार आहे. मला १०० दिवसांनंतर जरी विचारले तरी मी ते सांगेन, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना भाई जगताप यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. ‘आगामी महापालिका निवडणुकीमध्ये  माझा आजही विचार वेगळे लढण्याचा आहे आणि १०० दिवसांनंतर मला जर पुन्हा विचारले तर  तोच निर्णय असणार आहे आणि महापालिकेची निवडणूक येईपर्यंत माझा विचार तोच असणार आहे’, असं भाई जगताप यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा वाद होण्याची चिन्हे आहेत.