कोल्हापूर (प्रतिनिधी) : रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील e-KYC व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. ३१ जानेवारी पूर्वी प्रत्येक लाभार्थी रेशनकार्डवरील सर्व व्यक्तींचे १०० टक्के आधार सिडींग आणि प्रत्येक शिधापत्रिकेसाठी किमान एक वैध मोबाईल क्रमांक सीड करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. त्यामुळे जे ३१ जानेवारीअखेर ज्यांचे सीडिंग पूर्ण होणार नाही, त्यांना फेब्रुवारीपासून धान्य मिळणार नाही.

ते म्हणाले की, नियमित धान्य मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांनी धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे आपल्या शिधापत्रिकेतील ज्या व्यक्तींचे आधार क्रमांक सिडींग करण्यात आले नाही त्यांनी रास्तभाव दुकानदार यांच्याकडे आधार कार्ड घेऊन जावे व सिडींग पूर्ण करावे. आधार सिडींग करण्यात काही अडचणी येत असतील तर संबंधित तहसील कार्यालय, पुरवठा शाखा यांच्याशी संपर्क साधावा. ३१ जानेवारीपर्यंत आधार सिडींग न झालेल्या व्यक्तींचे मंजूर धान्य फेब्रुवारी महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित करण्यात येणार आहे.