कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे ३१ डिसेंबर आणि नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याबाबत राज्य शासनाने सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, शासनाच्या सूचनांचे जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करुन सरत्या आणि नववर्षाचे स्वागत साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

ते म्हणाले की, ३१ डिसेंबर रोजी नागरिकांनी तलाव, उद्याने, नदीघाट अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता योग्य सामाजिक अंतर राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषत: रंकाळा तलाव, कळंबा तलाव, नदीघाट परिसर, उद्याने आदी ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते. त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनामुळे ६० वर्षांवरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. धार्मिक स्थळीही एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये. आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.