पुणे (प्रतिनिधी) : सामनामध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. त्यामुळे ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिसीविषयी लिहिताना अग्रलेखात आपल्याविषयी वापरलेली भाषा अशोभनीय असल्याची तक्रार चंद्रकांतदादांनी केली आहे.

‘डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य’ अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांवर ‘सामना’तून बोचरी टीका करण्यात आली होती. “शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्यावेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. संपादक म्हणून ही त्यांची भाषा असू शकत नाही, मग अग्रलेखात ती कशी? त्यामुळे त्यांना मी पत्र लिहिणार आहे” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

‘ईडी’ च्या बाबतीत ज्यांना ‘घटना’ आठवते त्यांनी राज्यपाल नियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवले पाहिजे, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांना लगावण्यात आला होता. ‘ईडी’वगैरेचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल, या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे, असंही राऊतांनी म्हटले.