मुंबई (प्रतिनिधी) : सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात मागील आठवड्यासारखा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात देखील राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे. यामुळे पुन्हा बळीराजाच्या ह्रदयात धडकी भरणार आहे. गेल्या आठवड्यातील पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असताना पुन्हा मुसळधार पाऊस झाला तर खरीप हंगामातील काढणी टप्यातील पिके जमीनदोस्त होणार आहेत. 

परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. अद्याप केंद्र किंवा राज्य सरकारकडून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. अशात आता आणखी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रावरून नुकताच गेलेला कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. आता १८ ते २१ ऑक्टोबरदरम्यान तमिळनाडू, आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि तेलंगणामध्ये मुसळधार, तर २० ऑक्टोबरला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पट्ट्याची तीव्रता आणि त्याच्या प्रवासावर महाराष्ट्रावरील परिणाम ठरू शकणार आहे.