कोल्हापूर (प्रतिनिधी) :  नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. हळूहळू थंडी सुरू झाली आहे. थंडीच्या दिवसात गुळ खाण्याचे खूप फायदे होतात. थंडी पडण्यास सुरुवात होण्याआधीच दररोज थोडा गुळ खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल. गुळ आरोग्यासाठी गुणकारी आहे. नियमित गुळ खाण्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. त्वचा उजळण्यास मदत होते. या व्यतिरिक्तही गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊ गुळ खाण्याचे फायदे.

गुळामध्ये भरपूर पोषक तत्व समावली आहेत. जीवनसत्व अ आणि जीवनसत्व ब, तीन प्रकारच्या नैसर्गिक शर्करा, प्रथिने, लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, जस्त, मँगनीज अशा शरीराला आवश्यक पोषक तत्वांनी संपन्न आहे गुळ. खनिजांनी संपन्न असलेला गुळ त्वचेसाठी नैसर्गिक क्लींझरचे काम करतो. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. गुळातील नैसर्गिक शर्करा शरीराचा थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यास मदत करते. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी गुळ लाभदायी आहे. नियमित गुळ खाल्ल्याने तब्येत उत्तम राहण्यास आणि सौंदर्यवृद्धीसाठी मदत होते.

गुळ खाण्याचे फायदे..

१) एक चमचा गुळाची पावडर, एक चमचा टोमॅटोचा रस, एक चमचा लिंबू रस, चिमूटभर हळद यांचे मिश्रण करुन त्वचेला लावावे. हा लेप १५ मिनिटे तसाच ठेवून पाण्याने धुवावा. या कृतीमुळे त्वचा उजळण्यास मदत होते. दररोज त्वचेला हा लेप लावल्यास त्वचेवरील अनेक प्रकारचे डाग, व्रण हळू हळू निघून जातात.

२) एक चमचा गुळाची पावडर, एक काळ्या चहाची पावडर, एक चमदा द्राक्षाचा रस, चिमूटभर हळद, थोडे गुलाब पाणी यांचे मिश्रण करुन शरीराच्या सुरकुत्या आलेल्या भागाला लावावे. हा लेप २० मिनिटे तसाच ठेवून पाण्याने धुवावा. या कृतीमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 

३) दररोज थोड्या प्रमाणात गुळाचे सेवन केल्यास अॅसिडिटी, अपचन, गॅस असे अनेक पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. गुळ, सैंधव मीठ आणि काळे मीठ यांचे मिश्रण खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

४) नियमित गुळाचे सेवन केल्यास शरीरातील शुद्ध रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. 

५) दररोज गुळ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

६) हाडे मजबूत होतात.

दररोज थोडा गुळ खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक कॅल्शिअम आणि फॉस्फरस गुळातून शरीराला मिळते. गुळ आणि आल्याचे मिश्रण करुन त्याचे दररोज सेवन केल्यास हाडांशी संबंधित दुखणी कमी होण्यास मदत होते. सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

सर्दी पडसे झाल्यास गुळाचे सेवन लाभदायी ठरते. काळी मिरी आणि आल्यासोबत गुळाचे मिश्रण तयार करुन ते दररोज खाल्ल्यास सर्दीचा त्रास लवकर कमी होतो. साखरेऐवजी गुळ खाणे कधीही चांगले. साखरेच्या तुलनेत गुळ पचायला हलका आहे. आल्यासोबत गुळाचे सेवन केल्यास घसादुखी, आवाज बसणे किंवा घसा बसणे, घसा खवखवणे अशा समस्या दूर होतात.