मुंबई (प्रतिनिधी) : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती, असे व्हॉट्सअॅप चॅट मधील संभाषणातून स्पष्ट होत आहे. ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली?, हा देशद्रोहाचा प्रकार असल्याने अर्णब यांना तत्काळ अटक करण्याची मागणी काँग्रेसने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

रिपब्लिक टीव्ही वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट मधून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. यावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर आहे. लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली, ही माहिती गोस्वामी या पत्रकाराला कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी कशी काय मिळाली, त्यांनी अजून कोणाला ही माहिती दिली का ? या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामी यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.