शिर्डी (प्रतिनिधी) : अजितदादा माझे चांगले मित्र आणि कार्यक्षम नेते आहेत. मात्र, भाजपचे आमदार फोडण्याइतकी ताकद त्यांच्यामध्ये नाही. तसे असते तर, आमच्या ८० तासांच्या सरकारसाठी ते जेवढे आमदार सोबत घेऊन आले होते. तेवढे आमदार त्यांना टिकवता आले असते. त्यामुळे त्यांनी भाजपचे आमदार फोडणार अशी गमतीशीर विधाने करू नयेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते.  

पाटील म्हणाले की,  दादांनी राज्य चालवावे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करू. ते सध्या बोलत आहेत, तसे जाहिरपणे बोलून आमदार फोडले जातात का? आम्हीही तसे म्हणू शकतो.  न्यायालयाने दिलेला निकाल तुम्हाला मान्य करावा लागेल.  देशात घटनेनुसार केंद्र-राज्य संबंध, न्यायालये आणि कायदे, अशी रचना आहे. ती तुम्हाला मान्य नाही का? असा सवाल त्यांनी कारशेडच्या मुद्द्यावरून केला. एक अधिक एक अधिक एक, यांची बेरीज तीन होते. याचा अर्थ सरळ असा, की तीन राजकीय पक्ष एकत्र आले, तर त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत फायदा होईल. मात्र, भाजप सर्व ताकदीनिशी या निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीत असे विश्लेषषण करून चालत नाही. अधिक मते मिळवितो, तो विजयी होतो, असेही पाटील म्हणाले.