नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागील काही दिवसात कांदा आणि बटाट्याची किंमत वाढली होती. पण आता बाजारात बटाट्याची नवीन आवक झाल्याने बटाट्याची किंमत नियंत्रणात येऊ लागली आहे. गेल्या पाच दिवसांत बटाट्याचा दर ४० रुपयांवर आला आहे. त्याचबरोबर कांद्याचे दरही घटू लागले आहेत. तथापि, तेलाच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील बजेट पुन्हा बिघडले आहे. सर्व खाद्यतेल, शेंगदाणा, मोहरी तेल, वनस्पती, सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम आदी तेलाच्या सरासरी किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे.

ग्राहक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार, ६ डिसेंबरपासून देशातील किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. यामध्ये पाम तेलाचे दर १०० वरून १०९ रुपये, सूर्यफूल तेल १२३ वरून १२७ रुपये आणि मोहरी तेल १३३ रुपयांवरून १३७ रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले आहेत. पण शेंगदाणा तेलाच्या किंमती मात्र अडीच टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.