कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील पाच वर्षातील प्रत्येक प्रभागातील कामांचे ऑडीट करण्यात यावे आणि घरफाळा संदर्भात तात्काळ दोषींवर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह शहरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, विकासात्मक प्रश्न तसेच नागरिकांच्या समस्येबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने सोमवार (दि. ९ नोव्हेंबर) रोजी महापालिकेवर पंचनामा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोर्चात रस्त्यांची दूरावस्था, शाळा बंद होत चालल्या आहेत, घरफाळा घोटाळा आणि नागरिकांच्या अडचणी यांसह अनेक कामांचा पंचनामा होणार असून हा मोर्चा दसरा चौकातून महापालिकेवर काढण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला जिल्हा अध्यक्ष निलेश रेडेकर, युवा अध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, संघटनमंत्री सुरज सुर्वे, महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील, युवा शहर अध्यक्ष मोईन मोकाशी, शिवाजी मोरे उपस्थित होते.