नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्ष महत्वाची भूमिका बजावतील. भाजप आगामी लोकसभा निवडणूक एकतर्फी जिंकेल, असे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल. भाजपला बहुमत मिळणे अवघड आहे, असे महत्वपूर्ण विधान नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी केले आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याकडे पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे, असेही सेन यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्ष खूपच कमकुवत झाला आहे. पण, त्या पक्षाची ताकद ही त्यांचा देशव्यापी दृष्टिकोन आहे, जो इतर कोणत्याही पक्षाकडे नाही. अर्थतज्ज्ञ सेन म्हणाले की, लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत काही प्रादेशिक पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतील. यामध्ये द्रमुक, टीएमसी यांसारख्या पक्षांचा समावेश आहे. समाजवादी पक्षही तत्कालीन राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल, असे म्हटले होते. ते म्हणाले की, भाजपने हिंदुत्वाकडे झुकणारा पक्ष म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे कोणताही पक्ष भाजपची जागा घेऊ शकत नाही.
सेन यांनी भाजप सरकारवर यापूर्वीही अनेकदा टीका केली आहे. सेन म्हणाले की, भाजपने भारताच्या व्हिजनला कमी केले आहे. भाजपने फक्त हिंदू भारत आणि हिंदी भाषिक भारत म्हणून पाहिले आहे. भाजपशिवाय पर्याय नाही, हे पाहणे आज खूप दुखदायक आहे. भाजप आज सर्वाधिक शक्तीशाली वाटत असेल, तर त्यांचा काही कमकुवतपणाही आहे. मला वाटते की विरोधी पक्षांनी प्रयत्न केल्यास ते भाजपला टक्कर देऊ शकतात.
ममता बॅनर्जी पंतप्रधान होऊ शकतात का, असा प्रश्न अमर्त्य सेन यांना विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की, बॅनर्जी यांच्याकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. पण, ममता बॅनर्जी भाजपच्या विरोधात जनतेचा रोष एकत्र करू शकतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. काँग्रेसबाबत बोलताना सेन म्हणाले की, काँग्रेस पक्ष कमकुवत झाला आहे. काँग्रेसमध्ये गटबाजीही मोठी समस्या आहे.