- महिलांच्या ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर
- बाटली आडवी करण्यासाठी व व्यसनाधिनतेविरोधत महिला ग्रामसभेत संतप्त
- पालखी मार्गावरील पुल सोयीच्या ठिकाणी करण्याचीही मागणी
पंढरपूर (प्रतिनिधी) :
गावच्या विकासात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी तुंगत ता पंढरपूर येथील ग्रामपंचायतकडून प्रयत्न केले जात आहेत. समस्या मांडण्यासाठी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याने गावातील व्यसनाधितेवर महिलांनी आवाज उठविला आहे. महिलांच्या विशेष ग्रामसभेत ‘दारुबंदीचा’ ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे. या ठरावामुळे या गावात सुरू असलेले अवैध दारू व्यवसाय बंद होणार असल्याचे बोलले जात आहे.
आळंदी ते मोहोळ पालखी मार्ग तुंगत येथून जातो. रस्त्याचे काम सुरू असून तुंगत येथे भुयारी रस्ता तयार करण्यात आलेला आहे. सध्या ग्रामस्थांना व वाहनांना जाण्यासाठी पुलाची जागा संबंधित विभागाकडून नियोजीत करण्यात आलेली आहे. नियोजित पुलाची जागा महिला, वृद्ध आणि प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीची होत आहे. पालखी मार्गामुळे बाहेरील व्यक्तींची गती वाढेल परंतु सध्याच्या पुलामुळे तुंगत ग्रामस्थांची व वाहनांची गती मात्र कमी होईल, त्यामुळे ग्रामस्थांना सोयीचा होईल याठिकाणी पुलाची निर्मीती होणे गरजेची आहे. यासंदर्भातही महिलांच्या ग्रामसभेत एकमताने ठराव करण्यात आला आहे.
तुंगत येथे दारुविक्रीसाठी कोणताही शासनाचा अधिकृत परवाना देण्यात आलेला नाही. दारुविक्री करु नये यासाठी सुरूवातीपासूनच ग्रामपंचायतने कुणासही परवान्यासाठी परवानगी दिलेली नव्हती. परंतु सध्या अवैधरित्या व खुलेआमपणे दारुविक्री सुरू आहे. व्यसनानिधतेमुळे कुटुंबात वाद होण्याचे प्रमाण वाढत आहे. निवडणूक, जञा, सार्वजनिक कार्यक्रमातही भांडणे होण्याचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात तुंगत संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. गावात शांतता प्रस्थापित होऊन गावाचा नावलौकिक वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न सुरू आहेत.
संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल
” दारुबंदी होण्यासाठी केलेल्या ठरावाची प्रत किंवा तक्रार आल्यानंतर अवैधरीत्या दारु विक्री सुरू असेल तर बंद करण्यात येईल. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.”
(पी.ए.मुळे.निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग,पंढरपूर)
——————————-
दारुबंदीने कुटुंबांची वाताहात थांबेल
” महिलांनी एकमुखाने दारुबंदीसाठी ग्रामसभेत मागणी केली आहे. यासंदर्भात सर्वांनुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. व्यसनाधिनता कमी करुन गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दारुबंदी केल्याने कुटुंबांची सर्वच बाबतीत होणारी वाताहात थांबणार आहे. व्यसनमुक्तीच्या दिशेने गावची वाटचाल सुरू आहे.”
(डाॅ.सौ.अमृता रणदिवे, सरपंच, ग्रामपंचायत,तुंगत)