कागल (प्रतिनिधी) : भीमा-कोरेगाव येथे २०५ वर्षांपूर्वी बटालियनने अद्भुत आणि अतुलनीय शौर्य गाजवले. त्या शौर्याला आम्ही सर्वजण नतमस्तक आहोत, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.    

कागलमधील निपाणी वेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये भीमा-कोरेगावच्या २०५ व्या शौर्य दिनानिमित्त उभारलेल्या शौर्यस्तंभास आमदार मुश्रीफ यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक महादेव ईराप्पा कांबळे होते.

आ. मुश्रीफ म्हणाले, चार वर्षांपूर्वी भीमा-कोरेगावला दुर्देवी घटना घडली आणि हा शौर्यस्तंभ चर्चेत आला. एक जानेवारी रोजी बटालियनच्या अवघ्या ५०० बहाद्दर सैनिकांनी अतुल्य ऐतिहासिक शौर्य गाजवले होते. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.

यावेळी शौर्य स्तंभाची प्रतिकृती उभारणाऱ्या सुरेश घस्ते यांचा आ. मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख मान्यवरांनी राजर्षी छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.

यावेळी चंद्रकांत गवळी, मेजर सुभेदार लगमाना कांबळे, तुषार भास्कर, विवेक लोटे, दिपक वादळ, बच्चन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.