कोल्हापूर (प्रतिनिधी) : अर्हता दिनांकाच्या तांत्रिक अडचणीमुळे छ. राजाराम सहकारी साखर कारखान्याचे काही सभासद मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे आम्हाला मतदानाचा हक्क मिळाल्यानंतरच राजाराम कारखान्याच्या निवडणूका घ्याव्यात अशा मागणीचे निवेदन सभासदांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर विभागाला दिले आहे.

कारखान्याच्या सभासदांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र राज्य शासनाने २९ नोव्हेंबरच्या संकिर्ण २०२२ प्र.क्र.२१५ /१३ स, या आदेशान्वये ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थाचा निवडणूकीचा कार्यक्रम एकाच कालावधीत येत होता. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांना आपला सहभाग नोंदवता यावा यासाठी राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणूका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे कळविले होते. त्यानंतर आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबल्या असतील तेथून पुढे २० डिसेंबरनंतर सुरू कराव्यात, असे आदेशित केल्याचे समजते. सदरची बाब विचारात घेता या संस्थेच्या प्रत्यक्ष निवडणूक संपूर्ण प्रक्रियेकरीता ३ महिन्याचा कालावधी विचारात घेता संस्थेची निवडणूक मार्च अथवा एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे.

याला अनुसरून सभासदांनी अशी विनंती केली आहे की, छ. राजाराम सहकारी साखर कारखान्याची मतदार यादी तयार करण्यासाठी अर्हता दिनांक ३१/१०/२०२२ ऐवजी ३१/०३/२०२३ करण्यात यावी. जर आपल्या दि. ११/११/२०२२ च्या आदेशान्वये प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी निश्चित केलेल्या अर्हता दि. ३१/१०/२०२२ नुसार कारखान्याने मतदार याद्या तयार केल्यास आम्हाला महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० नुसार प्राप्त झालेला मतदानाचा मुलभूत कायदेशीर हक्क बजावता येणार नाही. आणि आमच्यासारखे असंख्य सभासद या संस्थेच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत.

महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० नुसार आम्हाला प्राप्त झालेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या संस्थेच्या प्रारूप आणि अंतिम मतदार यादीमध्ये आमचे नाव समाविष्ट होण्यासाठी संस्थेची प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी निश्चित केलेली अर्हता दि. ३१/१०/२०२२ ऐवजी ३१/०३/२०२३ करावी अशी विनंती सभासदांनी केली आहे. असे न झाल्यास मतदानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणल्याबद्दल आंदोलन करण्याचा इशारा सभासदांनी दिला आहे.

यावेळी वसंत शिरगावे, राजेंद्र शिंदे, विनोद चव्हाण यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.