कागल (प्रतिनिधी) : कर्नाटकातील सीमावासीय मराठी बांधवांचे कागल शहर आणि कोल्हापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी झेंडा आणि पुष्पगुच्छ देऊन कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तर रहेगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में अशा घोषणा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकत्यांनी दिल्या.     

आठवड्यापूर्वी कर्नाटक सरकारने बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली होती. तसेच, आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरातून बेळगावला जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना रोखले होते. याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील धरणे आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्त्यांचे आयबीपी पेट्रोल पंपावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, कोल्हापूरचे माजी महापौर आर. के. पोवार, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना भगवा ध्वज आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

तर बाबा पार्टे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर, बेळगावचे माजी महापौर शिवाजीराव सुंटकर, प्रकाश मगराळे, कृष्णा हुंदरे, सरस्वती पाटील, रेणू किल्लेकर, सुनिल अष्टेकर, मालोजी अष्टेकर, हनमंत मजुकर, मुरलीधर पाटील यांच्यासह सीमा भागातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी बांधवांची मोठी गळचेपी करीत आहे. दोन्ही राज्यात भाजपा सरकार असून हे सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तर बेळगावहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या या मराठी बांधवांच्या रॅलीमध्ये काही वयोवृद्धांच्या हातामध्ये, आमच्या हयातीत सीमा प्रश्न सुटेल का ? असे लिहिलेले फलक त्यांच्याकडे दिसत होता.